इंदापूर : शरद पवार यांच्या आशिर्वादाने इंदापूरसह राज्यात सत्ता बदल निश्चित होणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. २५) नीरा नरसिंहपूर येथे बोलताना व्यक्त केला.
नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात आपल्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर पाटील बोलत होते. यावेळी यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.
पाटील म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार यांचे नेतृत्व आपणा सर्वांना लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरात व राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता बदल हा निश्चित आहे.इंदापूर तालुक्यातील सध्याच्या राजकीय बदलाच्या लाटेमध्ये जनतेने सहभागी व्हावे.
ज्येष्ठ नेते शंकरराव पाटील यांच्या सन १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासून श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करून,श्री लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आज ही कायम आहे.इंदापूर तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधीची दहा वर्षाची निष्क्रिय कारकीर्द संपवून,इंदापूर तालुक्याचा सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासाला दहा वर्षांचा लागलेला ब्रेक आगामी पाच वर्षात निश्चितपणे भरून काढला जाईल,अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
सध्याच्या लोकप्रतिनिधीनी त्यांच्या काळात सहकारी संस्था, शिक्षण संस्था काढून रोजगार देण्याचे काम केले नाही. उलट गुण्या-गोविंदाने एकत्र राहत असलेल्या समाजा-समाजामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. शासनाकडून विकास कामासाठी येणारा पैसा हा जनतेचा पैसा असतो. मात्र हा पैसा तालुक्यातील जनतेच्या विकासाऐवजी काही ठराविक लोकांच्या खिशात गेलेला दिसत आहे.सध्याच्या लोकप्रतिनिधी बनवा-बनवी थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला साथ द्या, असे आवाहन पाटील यांनी केले.
वयाच्या ८४ व्या वर्षी ही अपराजित योध्दा म्हणून शरद पवार लढत आहेत. या वयात त्यांचा काही स्वार्थ आहे का? तरी ही ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची त्यांची इच्छा आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम त्यांना करायचे आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तुतारीला विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन पाटील यांनी केले.
प्रास्ताविक प्रकाश काळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील,अशोकराव घोगरे,शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, संतोष मोरे यांची भाषणे झाली.
विलासराव वाघमोडे,उदयसिंह पाटील,अमोल भिसे, मयूरसिंह पाटील,गणेश इंगळे,पांडुरंग हेगडे,सिकंदर पैलवान, सुरेश जगदाळे,मनोज पाटील,किरण पाटील,रवींद्र जगदाळे, शेखर पाटील,रणजीत वाघमोडे,रोहित जगदाळे,सुरेश मेहेर, प्रतापराव पाटील,दादासाहेब घोगरे,प्रकाशराव मोहिते,शरद जगदाळे पाटील,शिवाजी हांगे,तानाजीराव नाईक,उत्तमराव जाधव,विक्रम कोरटकर,प्रभाकर खाडे,रणजित गिरमे,हरिभाऊ बागल,प्रदीप बोडके,संजय शिंदे,नामदेव घोगरे,विठ्ठल घोगरे, नानासाहेब देवकर,कैलास हांगे,माणिकराव खाडे,राजाभाऊ मोहिते,बापू जगदाळे,दादा पाटील,हनुमंत काळे,पप्पू गोसावी, समीर पाटील,दत्तात्रय ताटे देशमुख,किशोर माहिते,मेघनाथ सरवदे,बळीराम गलांडे,अभिजीत पावसे,शहाजी पावसे,महादेव भोसले,दीपक पावसे आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार नाथाजी मोहिते यांनी मानले.या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन पाटील यांनी व्याहळी येथे जाऊन भैरवनाथ मंदिरात परंपरेनुसार प्रचाराचा नारळ फोडला.
●● ‘अनेक वर्ष मंत्रिमंडळात असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे खंडकरी शेतकऱ्यांना पाट पाण्याच्या हक्कासह जमिनी मिळाल्या आहेत. मी ही त्या काळातील खंडकरी शेतकरी समितीचा सदस्य आहे.केवळ हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच इंदापूर तालुक्यातील सुमारे २ हजार २१५ एकर जमीन खंडकरी शेतकऱ्यांना मिळू शकली. राज्यातील कार्यक्षम व अभ्यासू नेतृत्व असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवा’.: ॲड.तेजसिंह पाटील ●●
